हा ब्लॉग शोधा

सोमवार, १८ ऑगस्ट, २०१४

उत्सव बहु थोर होत...

अमुक उत्सवाचा उद्देश कोणता? किंवा 'खरा' उद्देश कोणता? ह्या प्रश्नांना खरंच काही अर्थ असतो का? उत्सवांचा वापर विविध मंडळी आपापल्या हेतूंसाठी करून घेत असतात. हे केवळ धार्मिक उत्सवांनाच लागू नाही. इतरही उत्सवांचं तेच आहे. अनेकांना हे उत्सव हवे असतात. गोंगाट, ध्वनिवर्धकांचा ढणढणाट, उन्मादी नृत्यं, अगदी दोन्ही प्रकारचं दारुकामसुद्धा!

कदाचित ह्यामागे काही स्वाभाविक मानवी प्रेरणा असतील. दैनंदिन रहाटगाडग्यातून सुटका म्हणून हा उत्सवी उतारा असेल. काहीही असेल. पण हे उत्सव आपल्या सामाजिक जगण्याचा अविभाज्य भाग झाले आहेत. बाजार हा जर आपल्या सगळ्याच जगण्यात महत्त्वाचा ठरत असेल तर उत्सवावर त्याचा परिणाम होऊ नये ह्या अपेक्षेला काय अर्थ आहे? उत्सव हे बाजाराला सोयीचेच असतात. मागणी निर्माण झाली की पुरवठ्याची सोय होतच असते.

समाजही एकसंधपणे उत्सव साजरे करत नाही. काही उत्सव 'आपले' असतात. काही उत्सव 'त्यांचे'. त्यामुळे 'त्यांच्या' उत्सवाला नावं ठेवत 'आपले' उत्सव साजरे करत राहण्याची उत्तम सोय उपलब्ध असते. उत्सव हा 'संस्कृती'चा आविष्कार असतो. त्यामुळे संस्कृती जपण्यासाठी ते साजरे करावेच लागतात. कोणती संस्कृती केव्हा अंगीकारायची ह्याचं स्वातंत्र्यही आपल्याला असतंच. त्यामुळे 'पाश्चात्त्य' संस्कृतीला नावं ठेऊन आपण ३१ डिसेंबरच्या रात्री धिंगाणा घालायला मोकळे असतो. फुले, आगरकर, आंबेडकर ह्यांचं नाव घेत आपल्याला उंचच उंच थरांच्या दहीहंड्या बांधायला कसलीच अडचण नसते. पवित्र धार्मिक उत्सव असं म्हणून मग त्याच्या नावावर दारू पिऊन, बीभत्स हालचालींची नृत्यं करायला काहीच आडकाठी नसते. थोरांच्या जयंत्या/ मयंत्या साजऱ्या करायला विचारांची आवश्यकता नसते. दिवसभर ध्वनिवर्धक ढणढणत असले. मिरवणुका आणि मंडप बांधून वाहतुक अडवता आली की ते पुरेसं असतं.

आपली सामाजिक जाणीव इतकी जागृत असते की कोणतीही नियमावली नसलेले जीवघेणे 'खेळ' आपण आयोजित करतो आणि खेळणाऱ्यांच्या जिद्दीचं आणि मेहनतीचं कौतुक करत बघायला मोठ्या संख्येने उपस्थित राहतो. टाळ्या वाजवतो. यशस्वी होणाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो. थर लावणाऱ्या गोविंदांवर पाणी भरलेले फुगे मारताना मजा येते हे नाकारण्यात काय अर्थ आहे? आपला फुगा बसून थर कोसळला तर जेवढी मजा येते तितकंच कुणी थरावरून पडून घायाळ झालं किंवा कुणाला जीव गमवावा लागला तर व्यक्त होणारी आपली हळहळ ही खरी नसते असंही म्हणता येणार नाही.

उंचच उंच थर लावणाऱ्या गोविंदांचं कौशल्य, त्यांनी घेतलेले कष्ट हे खरेच असतात. त्यांचा उत्साह, त्यांचं साहस नाकारता येईल का? मंडळं इतके कष्ट घेऊन पोरं जमवतात. त्यांना थोडी (काही लाखांची!) बक्षिसं मिळाली तर त्यात वावगं काय आहे? कोणता खेळ सर्वस्वी सुरक्षित असतो? आणि साहसी खेळ हे अपघातप्रवण असणारंच. गोविंदांना ते माहीतच असतं.

जिथे इतक्या मोठ्या संख्येने लोक जमा होतात तिथे आपली पोळी भाजायचा काही जण प्रयत्न करणारच. मग सबंध परिसराला दुधाच्या पिशव्या पुरवल्या जातात. कृष्णाचा उत्सव असल्याने दही, दूध हवंच ना! मग छानछान नटनट्या आपलं कौशल्य घेऊन रंगमंचावर (व्यासपीठ, रंगमंच ह्या वेगवेगळ्या शब्दांपेक्षा ष्टेज हा शब्द सोयीचा आहे.) अवतरतात. भक्तिगीतं, प्रेमगीतं, लावण्या, डिस्को, रॅप अशा विविध कलाप्रकारांचं एकत्रित सादरीकरण होतं. त्यात 'आज गोकुळात रंग खेळतो हरी' आणि 'शीला की जवानी' एकत्र आली तर नाकं कशाला मुरडायची? सगळा सोवळेपणा आपोआप मोडून पडलेला असतो. 'समाधि से संभोग तक' आणि 'संभोग से समाधि तक' काहीही क्षणाच्या अवकाशाने उपस्थित होऊ शकतं.  आयोजक असलेले भाऊ/ दादा/ अण्णा/ आप्पा इ. दिवसभर उभे असतात. ध्वनिक्षेपक हातात घेऊन उत्साहाने बोलत असतात. आलेले 'ख्यातकीर्त' त्यांच्या गुणांचं तोंड भरून कौतुक करतात. त्यांचा प्रचार आपसूकच होतो. लोकांनाही फुकट कार्यक्रम बघायला मिळतात. दुधाच्या पिशव्या मिळतात. मग हे सर्व आयोजित करायला इतका पैसा कुठून येतो ह्याचा विचार कशाला हवा?

अशा अनेक सोयी उपलब्ध असणाऱ्या गोष्टींत सुधारणा करणं सोपं नाही. कारण सुधारणा करू इच्छिणारे सर्व एकसारखे नसतात. त्यांचेही वेगवेगळे हेतू असणार. पण ह्या सर्व क्रियाप्रतिक्रियांतून काही बदल घडून येतील. त्यांमुळे काहींच्या सोयी कमी होतील. पण काही चांगल्या गोष्टीही घडू लागतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.

विविध प्रेरणांनी घडून येणाऱ्या गोष्टींमध्ये काही जणांना आरोपी करून आपण मोकळं होणं सोपं आहे. पण तेवढंच करून फार काही चांगलं घडेल अशी अपेक्षा नाही. अनेक विचार, अनेक हेतू, अनेक हितसंबंध ह्यांच्या परस्परक्रियेतून जे घडायचं ते घडणार आहे. आपल्या म्हणण्यात कोणतेही हितसंबंध, हेतू, विचार नसतीलच असही नाही. मात्र आपण आपल्याला जितका विचार करता येतो तितका प्रामाणिकपणे करून त्यानुसार वागायचं ठरवलं आणि ते शक्य तसं वर्तनात आलं तरी ते उपयोगी ठरेल.

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०१४

महाराष्ट्र-राज्य-साहित्य-आणि-संस्कृति-मंडळाची प्रकाशने

महाराष्ट्र-राज्य-साहित्य-आणि-संस्कृति-मंडळाची प्रकाशने आता महाजालावर उतरवून घेण्यासाठी उपलब्ध झाली आहेत. खालील दुव्यावर मंडळाची ४४४ पुस्तके पीडीएफ स्वरूपात दिलेली आहेत.

सुबोध

  सुबोध   (छायाचित्राचे श्रेय : श्री. आशिष आल्मेडा) माणसामाणसांतल्या संबंधांमागचं काही गणित असेलही. पण मला तरी अजून ते उलगडलेलं नाही. आपल्या...