हा ब्लॉग शोधा

शनिवार, १७ एप्रिल, २०१०

स्वातंत्र्यदेवीची समजावणी

(दि. १० नोव्हेंबर १९९६च्या दैनिक सकाळच्या दिवाळी-पुरवणीत कविवर्य कुसुमाग्रजांची 'स्वातंत्र्यदेवीची विनवणी' ही कविता प्रसिद्ध झाली होती. म्हणजे सुमारे १४ वर्षांपूर्वी. एव्हाना लोकांना काय सांगण्याची आवश्यकता आहे हे स्वातंत्र्यदेवीला उमगलं असेल. आता ती लोकांना काय समजावेल हे सांगणारी ही कविता. अर्थात कविवर्य कुसुमाग्रज आणि शाहीर अनंतफंदी ह्यांची क्षमा मागूनच)

कसली नीती, न्यायहि कसला कसली आशा धरू नका
मीच सांगते जगायचे तर भलेपणाला भजू नका

काहि ठकांनी स्वातंत्र्याच्या स्वप्नांनी ठकविले तुम्हा
तेच खरे मानून आणखी भ्रमात भलत्या जगू नका

भ्रष्टाचारच एकमेव ह्या जगण्याचा आधार असे
भ्रष्ट व्हायचे नसेल तर मग जिवंत येथे राहु नका

सदा लाच द्या, घ्या जमली तर हाच खरा व्यवहार असे
देणेघेणे जमे न ज्यांना तया जगाया देउ नका

जनसेवेस्तव नसे कचेरी ती डाकूंची असे गुहा
मेजावरतुन मेजाखालुन लुटल्यावाचुन राहु नका

वेतन खाउन कामे करणे लक्षण हे तर मूर्खाचे
करोत दुसरे, बघोत तिसरे उगा लाज बाळगू नका

विचार जाळा थोरांचे अन् पुतळे त्यांवर थोर रचा
जातींमध्ये तया विभागा कार्य तयांचे स्मरू नका

समतेचा जप करा मुखाने उतरंडी पण मनी जपा
इतरांना उपदेश करा अन् स्वतः तसे पण वागु नका

'तगेल जो, तो जगेल' येथे हाच एक हो न्याय खरा
असाल दुबळे तर मग येथे स्वप्न जिण्याचे पाहु नका

असेल हिंमत नरड्यावरती पाय देउनी जगा इथे
नसेल तर मग शेपुट घालुन उगाच वाया भुंकु नका

गिऱ्हाईक व्हा नित्य कशाला विकावयाची आस उगा
परावलंबी राहा सदाचे नवी निर्मिती करू नका

परभाषेतच व्हा पारंगत द्रव्यसाधना करा खरी
माय मराठी सुखे मरू द्या परकीचे पद सोडु नका

भाषा कसली, देशहि कसला कुणी कुणाचे नसे इथे
निष्ठा, प्रीती, भक्ती असल्या मायाजाळी गुंतु नका

'असेच असते', 'हेच चालते' हा जगण्याचा मंत्र स्मरा
उगा जगाला बदलायास्तव प्राणपणाने झटू नका

'जन्मा आला निश्चित मरतो' हेच सुखाचे वाटुन घ्या
जन्मा आणि मरा कधीही 'करा' असे पण म्हणू नका

'शब्द बापुडे केवळ वारा' अर्थ फुकाचा शोधु नका
असल्या कविता वाचा, विसरा विचार त्यावर करू नका

४ टिप्पण्या:

  1. असल्या कविता वाचू, विसरू विचार त्याचाही करू नका

    उत्तर द्याहटवा
  2. असल्या कविता वाचू, विसरू विचारही त्याचा धरू नका

    उत्तर द्याहटवा
  3. हा नवा मंत्र अंगी बाणवायला फारसे सायास पडणार नाहीत. कारण त्यात वर्णन केलेले गुण सघ्‍या अभिजातच आहेत. सद्य:स्थितीचे यथार्थ वर्णन करणारी ही कविता सर्वसामान्य माणसाला विचारप्रवृत्त करणारी आहे. ती न आवडणा-यांना नावडो. वास्तव विस्तव होत चालले आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. शिधापत्रिकांच्या मलपृष्ठावर कुसुमाग्रजांची कविता होती आता युआयडी कार्डांवर ही छापायला हरकत नाही. मागे तू 'मराठी असे आमुची मायबोली'चेही असेच विडंबन ऐकवले होतेस तेही इथे टाक...

    उत्तर द्याहटवा

सुबोध

  सुबोध   (छायाचित्राचे श्रेय : श्री. आशिष आल्मेडा) माणसामाणसांतल्या संबंधांमागचं काही गणित असेलही. पण मला तरी अजून ते उलगडलेलं नाही. आपल्या...